Contents
शिरूर : हॉर्न वाजवण्यावरून तिघांकडून व्यावसायिकास मारहाण, जीव घेण्याची धमकी!
शिरुर बातमी अपडेट
शिरूर,दिनांक ७ ऑक्टोबर २०२५|प्रतिनिधी|
” शिरूर तालुक्यातील गंगा पेट्रोलपंप परिसरात हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून तिघा अनोळखी इसमांनी व्यावसायिकास खाली पाडून मारहाण केली. आरोपींनी दगडाने डोक्यावर प्रहार करून जीव घेण्याची धमकी दिली. शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.”
शिरूर तालुक्यातील गंगा पेट्रोलपंप परिसरात किरकोळ कारणावरून तिघा अनोळखी इसमांनी एका व्यावसायिकास खाली पाडून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “हॉर्न का वाजवला?” या वादातून ही मारहाण झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत फिर्यादीला चेहऱ्यावर जखम झाली असून आरोपींनी “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचे समजते.
🔹 घटनेचा तपशील—-
ही घटना दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास शिरूर, गंगा पेट्रोलपंप परिसरात घडली.
फिर्यादी विश्वनाथ सिताराम चिपाडे,वय 40, व्यवसायिक, रा. बोराडेमळा, ता. शिरूर, जि. पुणे हे आपल्या कामानिमित्ताने त्या परिसरातून जात होते. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या वाहनाचा हॉर्न वाजवल्याबद्दल वाद घातला.
वाद चिघळताच आरोपी इसमांनी फिर्यादीला खाली पाडून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. शिवीगाळी करून त्यातील एका इसमाने तेथेच पडलेला दगड उचलून चिपाडे यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारल्याने त्यांना किरकोळ जखम झाली.
घटनेनंतर आरोपींनी “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली आणि घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
🔹 पोलिसांची कारवाई—–
या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली.
गुन्हा रजिस्टर नंबर 706/2025 असा दाखल करण्यात आला असून,
भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 352, 351(3), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार आर. एस. साबळे करत आहेत.
गुन्हा दाखल करणारे अंमलदार पोलीस हवालदार गवळी आहेच. या प्रकरणाचे सूत्रसंचालन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केंजळे आहेत.
🔹 आरोपींचा शोध सुरू—–
सध्या तिन्ही अनोळखी आरोपी फरार आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पेट्रोलपंप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक नेमण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी विनंतीही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
🔹 नागरिकांमध्ये संताप—-
शहरात दिवसाढवळ्या होत असलेल्या मारहाणीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे. किरकोळ कारणावरून हिंसाचार करण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सोशल मीडियावरून होत आहे.
