IMG 20250507 WA0001

“तू गेलास आणि माझं बालपण हरवलं –

“तू गेलास आणि माझं बालपण हरवलं”
(एक हृदयस्पर्शी शोककविता)

आठवतं का रे तुला बंटी,
मी पहिल्यांदा तुला घरी आणलं,
छोटंसं तु पिल्लू माझ्या कुशीत,
त्या दिवशी खरं तर माझं बालपण उमललं.

सकाळी उठल्यावर तुझं पहिलं हसू,
ते तुझ्या चेहऱ्यावर असायचं,
शाळेतून परतताना तुझं ,
शेपूट हलवणं माझं स्वागत करायचं.

पावसात भिजताना मी एकदा घसरले,
तुझ्या तोंडून चिंब भिजलेले उंदीर आले,
कधी मी रागावले, कधी हसले,
तरी तू माझा राहिलास सखा कायम गोंडस नि गोंजारलेला.

तुझ्या डोळ्यात असे एक भाषा ,
न शब्द, न वाक्य त्यात —तरीही ती मला समजायची,

मी रडले की तू लपुन कुशीत यायचास,
तुझ्या मिठीत माझं दुःख विरून जायचं.

पण एक दिवस आला. … तू थोडासा शांत झालास,

खेळणं, उड्या मारणं जरा कमी झालं,
आजी म्हणाली,

“त्याला ताप आहे”,
डॉक्टर आले खरे , पण काळजी माझी वाढली.

होत्या तुझ्या डोळ्यांत असहाय निःशब्द वेदना,
आणि माझं मन होतं — अजाण, अजून कोवळं,
“तो बरा होईल गं” म्हणायचे सगळे,
पण आतून मला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं…

ती रात्र होती जणु थांबलेली,
तू होतास माझ्या शेजारी शांत झोपलेला,
हातात होता हात, हृदयात होती भीती,
एक श्वास अखेरचा, आणि…

तू कायमचा निघून गेलेला.

मी मोठ्यांदा रडले बंटी,
माझ्यावर आभाळही तेव्हा कोसळलं,
“का गेला माझा सखा?”

मी विचारलं,
पण कुणाकडेच उत्तर नव्हतं रे, काहीच उरलं नव्हतं.

तुझी पाटी, तुझं अंथरूण, खेळण्याचा तो कोपरा,
सगळं जसंच्या तसं ठेवलं आहे रे,
तुझ्या आठवणींमध्ये मी आज जगते,
आजही झोपताना तूच असतोस
माझ्या स्वप्नांत .

आता मोठी झाले रे मी,
पण मनात अजूनही तीच पोकळी आहे,
कधीतरी परत येशील का रे बंटी?
माझं ते बालपण घेऊन? ते जे तुझ्यासोबत गेलं आहे.. 


"तू गेलास आणि माझं बालपण हरवलं -ही हृदयद्रावक कविता एका किशोरवयीन मुलीच्या तिच्या लाडक्या कुत्र्याबद्दलच्या प्रेमाची आणि त्याच्या निधनानंतरच्या दुःखाची आहे. ही कविता वाचताना वाचकाला नात्याची खोली, गमावलेले बालपण आणि विरहाची तीव्रता अनुभवायला मिळते.

डॉ.नितीन पवार

 

कवी- डॉ.नितीन पवार, शिरुर /पुणे.संपादक – सत्यशोधक न्युज. 

About The Author